बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ४ मे रोजी सकाळी ९ वाजता मानेगाव ते जळगाव जामोद अन्नदाता संघर्ष पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी या पदयात्रेत जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी बांधवांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निमंत्रक तथा काँग्रेसचे नेते संदीपदादा शेळके यांनी केले आहे.
सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा, शेतमालाला हमीभाव कायदा लागू करा, सोयाबीनला ८ हजार, कापसाला १२ हजार तर तुरीला १० हजार रुपये क्विंटल भाव द्या, पिककर्जाला कुठलीही अट लावू नका, कृषी साहित्य जीएसटी करमुक्त करा, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारून बेरोजगारांना नोकरी द्या, स्थानिक पुरावे ग्राह्य धरून आदिवासी बांधवांना जातीचे दाखले द्या, जि. प. शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा यासह इतर मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीची अपूर्ण आश्वासने, शेतीमालाला हमीभाव नाही, गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ व टंचाई, ईपस्टिन फाईल, खरात, झिरवळ प्रकरणात पारदर्शकतेचा अभाव, अमेरिकन ट्रेड डीलमुळे स्थानिक उद्योग व शेतकऱ्यांवर संकट, सामान्य जनतेवर अन्याय आणि प्रशासनातील अपयश हे पदयात्रेतील प्रमुख मुद्दे असणार आहेत.
