बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जगन्नाथ पुरी धाम येथे सन्मान
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जगन्नाथ पुरी येथील श्रीमद्भागवत महापुराण कथेच्या मंडपात 'बुलडाणा अर्बन'चे संस्थापक राधेश्याम देवकिशन चांडक उपाख्य भाईजी यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'अमृत प्रसाद' सन्मान सोहळा शनिवार २७ डिसेंबर रोजी उत्साहात पार झाला. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी रागावर मिळवलेले नियंत्रण आणि त्यांचे सेवामय जीवन नवीन पिढीसाठी प्रेरणादायी, आदर्शवत आहे, असे गौरवोद्वार काढले.
यावेळी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी आशीर्वचन देताना, शालेय जीवनात अर्थशास्त्र व इंग्रजी विषयात अपयशी ठरलेल्या भाईजींनी आज अर्थ आणि सहकाराच्या माध्यमातून १८ लाख सभासदांचे जीवन प्रकाशमान केले आहे. अनेक इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्था उभ्या केल्या.
* वेद कार्यास २५ लाखांची मदत :
याप्रसंगी बुलडाणा अर्बन परिवार आणि सहकार विद्यालयाच्या वतीने भाईजींच्या जीवनावरील 'समर्पण' ग्रंथाचे प्रकाशन झाले. 'अमृत प्रसाद' ध्वनी चित्रफित प्रदर्शित करण्यात आली.झंवर परिवारातर्फे धान्य तुला करण्यात आली. राधेश्याम चांडक परिवारातर्फे ४८ वेद विद्यालय, धर्मश्री प्रतिष्ठान आणि वेदश्री तपोवन या संस्थांना २५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.
* क्रोधाचा त्याग आवश्यक -राधेश्याम चांडक
सत्काराला उत्तर देताना भाईजी म्हणाले की, केवळ स्वतः साठी न जगता समाजासाठी दिलेले योगदान जीवनगाथा मोठी करते. बुलडाणा अर्बन ही २६ हजार कोटींची संस्था आणि २२ शाळा हे केवळ विश्वासावर उभे आहेत. वेळेचे अचूक नियोजन, दिलेला शब्द पाळणे आणि क्रोधावर नियंत्रण ही यशाची तीन सूत्रे त्यांनी सांगितली.
रागामुळे नाती उद्ध्वस्त होतात, म्हणून सुखी संसारासाठी क्रोधाचा त्याग करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आयोजक नंदकिशोर झंवर, डॉ. विनोद मंत्री, नंदकिशोर बाहेती, किर्ती व मनीष कासट, कोमल व डॉ. सुकेश झंवर, रमेशचंद्र चांडक, शिवनारायण बाहेती, रामवल्लभ बाहेती, कल्पना मंत्री, सुनीता झंवर, कांचन बाहेती, रमा बाहेती, महेश, चेतन, - श्याम, संजना, रितू, श्रीषा बाहेती आणि चांडक इत्यांदींची - उपस्थिती होती.
'बुलडाणा अर्बन'चे संस्थापक राधेश्याम देवकिशन चांडक उपाख्य भाईजी यांच्या वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जगन्नाथ पुरी धाम येथील श्रीमद् भागवत महापुराण कथाप्रसंगी शनिवारी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हस्ते अमृत प्रसाद मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
