वनविभागाकडून सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईस स्थगिती द्यावी : ॲड.जयश्रीताई शेळक * पालकमंत्री पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

वनविभागाकडून सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईस स्थगिती द्यावी : ॲड.जयश्रीताई शेळके

* पालकमंत्री पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
           मोताळा तालुक्यातील मोहेगाव, खैरखेड, तरोडा, तारापूर, बोरखेड, धामणगाव देशमुख, पिंपळगाव नाथ, रामगाव तांडा आणि गिरोली या गावांमध्ये वनविभागाकडून अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आलेली आहे. या कारवाईस तात्पुरती स्थगिती देऊन संबंधित जमिनी नियमित करण्यात येण्यासंदर्भात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ता ॲड.जयश्रीताई शेळके यांच्यावतीने बुलढाणा पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांना निवेदन देण्यात आले.
 
     दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,  मोताळा तालुक्यातील संबंधित गावांमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ आपापल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वनजमिनीवर शेती करत आहेत. या जमिनीवर त्यांनी स्वतःच्या कष्टाने सिंचनाची सोय, पिकांची लागवड व शेतीसाठी अन्य आवश्यक गोष्टी उभारलेल्या आहेत. अश्यावेळी वनविभागामार्फत अचानक अतिक्रमण हटाव कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, यामुळे त्यांच्या उपजीविकेवर मोठा आघात होणार आहे.
 
        संबंधित शेतकरी ग्रामस्थ हे  मागील २५-३० वर्षांपासून सदर जागेवर उपजीविका करतात. पेरणीच्या आणि पावसाळ्याच्या तोंडावर ही अतिक्रमण काढण्याची कारवाई होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये अत्यंत नाराजीचे व भीतीचे वातावरण आहे. तरी  वनविभागाच्या अतिक्रमण हटाव कारवाईस तात्काळ स्थगिती देऊन, गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, सदर गावांतील संबंधित शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या जमीनी नियमित करण्यात याव्यात, अशी मागणी  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
       
     यावेळी (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ता ॲड.जयश्रीताई  शेळके, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, युवासेना जिल्हाप्रमुख नंदु कऱ्हाडे,  तालुका प्रमुख लखन गाडेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मो.सोफियान, युवासेना तालुकाप्रमुख व बिरसिंगपूर सरपंच संजय शिंदे, युवासेना शहरप्रमुख अनिकेत गवळी यांच्यासह पक्षाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.