* अंगणातच कुटुंबीयांसह लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांसाठी वाढदिवस म्हणजे जल्लोषाची मोठी पर्वणीच असते. बडेजाव आणि थाटमाट काही औरच असतो. मात्र, शेतकरी नेते रविकांत तुपकर त्याला अपवाद ठरले आहेत. वाढदिवशी कुठलाही आनंदोत्सव साजरा न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्या घराच्या अंगणातच तुपकर यांनी पत्नी, आई, वडील, मुले आणि बहिणींसह १३ मे रोजी जन्मदिनी लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले. जगाच्या पोशिंद्यासाठी केलेला हा एल्गार अधिक तीव्र करण्यासाठी शेतकरी देखील मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी दाखल झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनही कास्तकार आल्याने या आंदोलनाला मोठी ताकद मिळाली. या आंदोलनाच्या माध्यमातून तुपकर कुटुंबीयांनी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
वाढदिवस हा आनंदाचा उत्सव म्हणून मनवला जातो, पण रविकांत तुपकर यांनी वाढदिवशी कुठलेही हारतुरे, सत्कार न स्वीकारता आजचा जन्मदिन शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी समर्पित केला. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी जगणारा नेता म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. शेतकऱ्यांवर त्यांनी अक्षरश: जीव ओवाळून टाकला आहे. 'जगेल तर शेतकऱ्यांसाठी, मरेल तर शेतकऱ्यांसाठी' या ध्येयाने जगणारे रविकांत तुपकर हे वाढदिवस साजरा न करता विविध मागण्यांसाठी अन्नत्यागाला बसले. वाढदिवशी आंदोलन करणारे रविकांत तुपकर हे राज्यभरातून एकमेव नेते ठरल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहेत.
पहलगाम हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. त्यातच दिवसाला दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतमालाला भाव नाही, शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला आहे. बँकांनी होल्ड लावले आहेत, सक्तीने कर्ज वसुली सुरू आहे. अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. शेतकरी प्रचंड अडचणीतून जातोय, तरुण अस्वस्थ आहेत, देशातील वातावरण अस्थिर आहे अशा पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करण्याचा विचारही मनाला पटत नसल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित जपण्यासाठी आपण आजचा हा लढा उभारल्याचे रविकांत तुपकर शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.