मेहकर : (एशिया मंच न्युज)
सहकार चळवळ बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिक राष्ट्रीयकृत बँकांच्या जाचक अटीमुळे त्रस्त आहेत. शेतकरी, सर्व सामान्य नागरिकांना वेळेवर कर्ज मिळत नाही म्हणून इच्छा नसतांना खाजगी फायनान्स कंपन्यानकडे जावे लागते आणि त्या कंपन्या कर्ज देऊन अव्वा च्या सव्वा व्याज आकारणी करून पठाणी वसूली करत आहेत, जनतेची नुसती लूट सुरु आहे. त्यामुळे पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घेऊन मध्यम शेतकरी छोटे व्यवसायिक त्यांची कुवत पाहून त्यांना मदत करून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत आमदार सिद्धार्थ खरात यांनी मांडले.
आमदार खरात यांनी ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासन सहकार विभाग व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेहकर येथिल गजानन महाराज संस्थान येथे काका कोयटे यांच्या नेतृत्वात आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या सहकार दिंडीचे स्वागत करतांना वरील विधान केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष मंत्री प्रतापराव जाधव होते तर , जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे, सुदर्शन भालेराव, प्रविण फडणवीस, माधवराव जाधव, गितेशचंद्र साबळे, गजानन फाटे, सुदेशजी लोढे, प्रमोदबापू देशमुख, सागर पाटील, ॲड. आकाश घोडे, ॲड, संदिप गवई, ऋषिकेश जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचलन शैलेश बावस्कर यांनी केले तर आभार सुदेशजी लोढे यांनी केले.