शाश्वत विकास हेच आपले ध्येय - संदीप शेळके* वन बुलढाणा मिशन : पातूर्डा येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शाश्वत विकास हेच आपले ध्येय - संदीप शेळके
* वन बुलढाणा मिशन : पातूर्डा येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद 
पातुर्डा : (एशिया मंच वृत्त)
      आपल्या जिल्ह्याचा मागासलेला जिल्हा असा उल्लेख होतो तेंव्हा मनाला वेदना होतात. ही परिस्थिती आपणास बदलायची आहे. शेती, सिंचन, उद्योग, रोजगार यासह सर्वच क्षेत्रात शाश्वत विकास करणे हेच आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन राजर्षी शाहु परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले. 

       पातुर्डा येथील ऐतेहासिक विहिरीजवळ १० ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, सरपंच रणजित गमतिरे, तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार चांडक, लिलाबाई ऐरोकार, नुराभाई, शेख अफसर शेख इस्माईल, रामदास सुरडकर, दादाराव परघरमोल, शेषराव वानखेडे, साहेबराव वानखेडे, रमेश सुतोने, माजी सरपंच संगीताताई ढोकणे, सुशिलाबाई झाडोकार अंबादास उगले, गोपाल बोपले, अविनाश बोपले, रामदास सुरळकर, निळकंठराव देशमुख, गोपाल डांगे, संतोष ढोकणे, दादाराव परघरमोल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

        पुढे बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले, शेती, सिंचन, शेतरस्ते, रोजगार यासह सर्वच परिस्थिती सुधारली पाहिजे. याकरिता जिल्ह्याच्या विकासाची आस्था, तळमळ असणे गरजेचे आहे. प्रबळ राजकीय इच्छाशक्ती हवी. आतापर्यत जे झाले ते यापुढे होऊ नये. याबाबत आपण सर्वांनी सजग होणे काळाची गरज आहे. जनतेचा नेत्यावर दबाव हवा. आपल्याकडे नेत्यांचा जनतेवर दबाव आहे. यामुळे सगळा घोळ पांगलाय. प्रश्न विचारा, समस्या मांडा, पाठपुरावा करा, जाब विचारा, आपले हक्क आणि अधिकार याविषयी सदैव जागृत राहा. बघा नक्की बदल घडेल. विकासित जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्याची त्यांनी ग्वाही दिली. प्रारंभी गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी जागोजागी माता-भगिनींनी संदीपदादा शेळके यांचे औक्षण केले. रॅलीत बालगोपाल, युवक, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

* महामानवांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत बोलणे हे भाग्य : 

       महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पातूर्डा नगरी पावन झालेली आहे. अशा या ऐतेहासिक भूमीत संवाद यात्रेच्या निमित्ताने बोलण्याचे आपणास भाग्य लाभले. आपल्यासाठी ही गौरवाची बाब असल्याचे सांगून संदीपदादा शेळके यांनी परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित बांधव आणि माता- भगिनी, युवक यांच्यासमोर वन बुलढाणा मिशनची भूमिका मांडली. जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास असलेल्या या लोकचळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. 


 * ऐतेहासिक विहिरीचे केले पूजन : 

       पातुर्डा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खुली केलेली विहीर आहे. संदीपदादा शेळके यांनी या ऐतेहासिक विहिरीचे पूजन केले. तसेच महात्मा फुले यांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, थायलंड येथून आणलेल्या तथागताच्या मूर्तीला अभिवादन केले. गावातील राधाकृष्ण मंदिर, गंभीर बाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, हनुमान मंदिर, देवीच्या मंदिरात दर्शन घेतले आणि दर्ग्यावर चादर चढवली. गावातील अध्यात्मिक आणि सामाजिक वातावरणाचे त्यांनी कौतुक केले.