संदीप शेळकेंना पक्षातून डावलण्याचा प्रयत्न? * राजकीय षडयंत्र : काँग्रेस कधी सुधरणार?

संदीप शेळकेंना पक्षातून डावलण्याचा प्रयत्न? 
* राजकीय षडयंत्र : काँग्रेस कधी सुधरणार?
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         राजकारण काही साधू संतांचा मठ नाही.. या वाक्याची प्रचिती अनेकदा आली आहे. विचारांशी प्रामाणिक राहून चालत नाही, तर ‘साम-दाम-दंड-भेद’ या नीतीचा वापर करून स्वतःला आणि पक्षालाही सिद्ध करण्याची गरज असते. परंतु, वैचारिक आणि तत्वाच्या गप्पा मारणारे पक्षातील बडे नेते असं काही गमावून बसतात, जे संघटन विस्तार आणि पक्ष मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असतात. बुलढाणा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून काँग्रेसला उतरती कळा लागली आहे, असे जाणकार सांगतात. अशा परिस्थितीत, एक सक्षम नेतृत्वाची गरज असते, विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्षांचे ‘होमटाऊन’ असल्याने जिल्हा पातळीवरील हे नेतृत्व इथलेच हवे, अशी अपेक्षा होती. खासदारकीची अपक्ष निवडणूक लढवून, बुलढाणा जिल्ह्यातील गावोगावी- खेड्यापाड्यात पोहोचलेले संदीप शेळके.. या नावाकडे जिल्हा काँग्रेसच्या ‘अच्छे दिन’ साठी बघितले जात असताना, अनपेक्षित निर्णय झाला.

          गेल्या वीस वर्षांपासून राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातून, समाजकारण आणि राजकारण करत संदीप शेळके यांनी आदर्श प्रस्थापित केला आहे. राज्यातील काही भागात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा शेळकेंच्या पुढाकारातून मदत पोहोचवण्यात आली. अशा सामाजिक उपक्रमांची संख्या मोजता येणार नाही एवढी आहे. पण, समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शाश्वत विकास साधायचा असेल तर, लोकांमध्ये यावं लागतं... यामुळे, राजकारण हाच उत्तम पर्याय असल्याने आधी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून युवकांची मोठी फौज संदीप शेळके यांनी तयार केली. पुढे, खासदारकीची अपक्ष निवडणूक लढवली, त्यादरम्यान, अनेकांनी गंमत म्हणून बघितलं असेल पण शेळकेंचा आत्मविश्वास कुणाच्याही नजरेत पडला नाही. त्यानंतर, काही काळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत सक्रिय राहिले. यानंतर, मोठी जबाबदारी आणि जिल्हा पातळीवर नेतृत्व करण्याच्या अपेक्षेने १० मार्च २०२६ रोजी त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश झाला. जिल्ह्यात आता ‘दादा पर्व’ अशी आशा कार्यकर्त्यांना लागली होती. परंतु, जिल्हा अध्यक्ष पदासाठी यंदा घाटाखालून म्हणजेच जळगाव जामोद येथून प्रकाश अवचार पाटील यांचे नाव समोर आले.
नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आणि त्यांच्या नेतृत्वात झालेल्या आसूड मोर्चात शेळके दिसून आले नाही, याआधी शेळके यांनी शाहू परिवाराच्यावतीने जिल्हाध्यक्षांचा सत्कार केला, हा भाग वेगळा.. 

      पक्ष निर्णयावरून समर्थकांचा हिरमोड झाल्यावरही शहरातील चौकाचौकात ‘शो मस्ट गो ऑन’ असे मोठे बॅनर लावून, पक्ष निर्णय मानत आपण पक्षासाठी प्रामाणिक राहून काम करण्याचा संदेश संदीप शेळके यांनी देण्याचा प्रयत्न केला होता. लोकाभिमुख नेतृत्व आणि लोकप्रियता असूनही त्यांना पक्षाने सिरियसली घेतले नाही, प्रदेशाध्यक्षंकडून त्यांच्या नावाचा नंतर उल्लेखही झाला नसल्याच्या चर्चेने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यापैकीच एक, काँग्रेस मधून डावलण्याचा प्रयत्न होतोय का? हा एक प्रश्न आहे..