कुसुमाग्रजांच्या कविता आणि त्यांचे साहित्य म्हणजे एक सुवर्णाक्षरांनी लिहिले पान होय : कवी सुधाकर मानवतकर

कुसुमाग्रजांच्या कविता आणि त्यांचे साहित्य म्हणजे एक सुवर्णाक्षरांनी लिहिले पान होय : कवी सुधाकर मानवतकर
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       स्थानिक विदर्भ महाविद्यालय बुलढाणा कला व वाणिज्य येथे मराठी विभागाच्या वतीने साहित्य श्रेष्ठ, कवी, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'मराठी भाषा गौरव दिन' कार्यक्रम उत्साहात पार पडला.

        याप्रसंगी मार्गदर्शन करताना 'कुसुमाग्रजांच्या कविता आणि त्यांचे साहित्य म्हणजे एक सुवर्णाक्षरांनी लिहिले पान होय, असे मत कवी  सुधाकर मानवतकर सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद गायकी सर होते. प्रमुख उपस्थितीत गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. सीमाताई सोनोने मॅडम होते. मान्यवरांच्या हस्ते जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर विद्यार्थी काव्य सादरीकरण कार्यक्रम घेण्यात आला. 
       यावेळी नम्रता जगनलाल खत्री व सागर समाधान कस्तुरे या वि‌द्यार्थ्यांनी मराठी लोक साहित्यातील लोकगीत व लोककाव्य सादर केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. मुनेश्वर जमईवार यांनी प्रास्ताविकेतून जागतिक मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमा मागील भूमिका विशद करताना सांगितले की, आज आपण आपली संस्कृती लोकसाहित्य, लोकगीत, लोकपरंपरा, लोककथा, लोकनाट्यप्रकार विसरलो आहोत हे आपल्या मराठी भाषेसाठी एकंदरीतच आपल्या सांस्कृतिक, साहित्यिक जगण्यासाठी व धोक्याचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गोविंद गायकी सर यांनी मराठी भाषेचा गौरव करताना विविध मराठी साहित्य प्रकार यांचा आढावा घेत साता समुद्रपार मराठी भाषा, लोकसाहित्य, लोकसंस्कृती सकसपने पोहोचवण्याचे व गाजवण्याचे कार्य यापूर्वीच्या साहित्यिक व कलाकारांनी केले आहे. तो ठेवा जतन व अधिक समृद्ध करून ठेवण्यातची जबाबदारी आता आपल्यावर आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी सजग असले पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्रमुख अतिथी प्रा. सीमाताई सोनोने मॅडम यांनी संत ज्ञानेश्वर ते संत तुकडोजी महाराज पर्यंत लोक साहित्याचा आढावा घेत मराठी भाषेतील माधुर्य, गोडवा, प्रसादिकता व सौंदर्य याचे उदाहरणासह मराठी भाषेचे मोठेपण समजावून सांगितले. यावेळी प्राध्यापक वृंद व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.