अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिक संकटात * तातडीने आर्थिक मदतीची गरज – ॲड. जयश्रीताई शेळके

अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिक संकटात 
* तातडीने आर्थिक मदतीची गरज – ॲड. जयश्रीताई शेळके
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे चिखली, मेहकर व सिंदखेडराजा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, मका आणि तूर यांसारखी पिके पाण्याखाली आली. शेतात पाणी साचल्यामुळे कुजली असून पुन्हा पेरणी करणे शक्य नाही. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या होत्या, अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यातच हुमनी अळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत असताना आता पुन्हा अतिवृष्टीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्रीताई शेळके यांनी शासनाकडे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे.

          चिखली शहरातील माळीपुरा परिसर हा नदीकाठचा असल्याने या भागात घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक घरांतील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, धान्य, कपडे व घरगुती साहित्य पूर्णपणे वाहून गेले आहे. परिणामी, या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासन कर्जमाफी द्यायला तयार नाही. शेतीमालाला भाव नाही. त्यात आता अतिवृष्टीमुळे अस्मानी आणि सुलतानी संकटात बळीराजा सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आज ॲड. जयश्रीताई शेळके यांनी माळीपुरा परिसरासह चिखली तालुक्यातील भोगावती, सोमठाणा, पेठ आणि बोरगाव काकडे येथील बाधित भागांचा दौरा केला. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

          चिखली, मोताळा आणि सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत. पिकं पूर्णपणे नष्ट झाली असून शेतकरी बांधवांवर प्रचंड गंभीर संकट उभं राहिलं आहे. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या शेतीच्या प्रचंड नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे अत्यंत आवश्यक आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.  ॲड. जयश्रीताई शेळके यांनी चिखलीचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून माळीपुरा व इतर बाधित भागांतील नागरिकांना तातडीने धान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याची, तसेच तालुक्यातील अतिवृद्धतीबाधीत शेतीचे पंचनामे करून त्वरित मदत देण्याची विनंती केली. या नुकसान पाहणी दरम्यान चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन शेळके, सदस्य सोसायटी पेठ शेषराव शेळके, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गजानन काकडे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दिनकर डुकरे, शिवसेना तालुकाप्रमुख किसनराव धोंडगे, शिवसेना युवा चिखली तालुका प्रमुख गजानन पवार, शिवसेना शहर प्रमुख श्रीराम झोरे, शिवसेना उपशहरप्रमुख रवि पेटकर, युवासेना उपशहरप्रमुख शंभू गाडेकर, युवासेना समन्वय अनिल जावरे, शिवसेना जेष्ठ नेते विश्वासराव खंडागळे, सरपंच बोरगाव काकडे गजानन वायाळ,  ग्रामपंचायत सदस्य बाळू पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव, गजानन डुकरे, राजेंद्र पांढरे, दिनकरराव शेळके, विठ्ठल शेळके, हरी गायकवाड, विष्णू गोलाई, सतीश जाधव, प्रा.अनंता काकडे, मधुकर वायाळ, देविदास पाटील, भानुदास चांगून, सागर लोखंडे यांच्यासह सर्व गावांमधील शेतकरी बांधव उपस्थित होते.