* तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश - ना.मकरंद पाटील
बुलढाणा (जिमाका) : (एशिया मंच न्यूज )
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि मेहकरसह इतर तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे, विहिरींचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आज 1 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीग्रस्त गावांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या सोबत आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, तहसीलदार भूषण पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. पाटील यांनी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुडपाळ, सिंदखेडराजा तालुक्यातील बिंबिखेळ आणि मेहकर तालुक्यातील वडगाव तेजन, डोणगांव या गावांना भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीबाबतची माहिती घेतली. यावेळी त्यांनी तात्काळ पंचनामे करून स्थानिक स्तरावर मदत देण्याचे आणि शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, "शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.पात्र शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळेल, यांची दक्षता प्रशासनाने घ्यावी.
दरम्यान, पालकमंत्र्यांनी लोणार सरोवराचीही पाहणी करून पर्यटकांसाठी सुविधा वाढवण्यासंबंधी सूचना दिल्या आणि पर्यटन विकासासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.