विधवा शेतकरी पत्नी स्वाती नागरेंचे राहत्या घरी अन्नत्याग आंदोलन


विधवा शेतकरी पत्नी स्वाती नागरेंचे राहत्या घरी अन्नत्याग आंदोलन
देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
         तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील राज्य शासन द्वारा आदर्श युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी शेतकऱ्याच्या मागण्यासाठी मागील १३ मार्च २०२५ रोजी आपल्या शेतात विष प्राशन करून शेकडो शेतकऱ्यासाठी बलिदान दिले. याला चार महिने उलटूनही कोणत्याच मागणीची पूर्तता करण्यात आली नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारले नाही. यामुळे त्यांच्या विधवा शेतकरी पत्नी स्वाती कैलास नागरे यांनी २१ जुलै पासून शिवणी अरमाळ येथील निवासस्थानी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.

आज त्याला चार महिने पूर्ण झाली.
कैलास नागरे यांच्या सुसाईड नोटमध्ये, त्यांच्या मुलांचं व कुटुंबाचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री यांनी तशी घोषणा विधानसभेमध्ये केली. पण त्याचं पुढे काय झालं ते अद्याप आम्हाला कळालं नाही. यामुळे आपण २१ जुलै पासून बेमुदत आमरण उपोषण करणार असा ईशारा श्रीमती स्वाती नागरे यांनी जिल्हा प्रशासन व सिंदखेड राजा एसडीओ यांना दिलेल्या निवेदना द्वारे दिला होता. त्यानुसार कैलास नागरे यांच्या पत्नीने २१ जुलै पासून घरातच बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.

         महाराष्ट्र शासन युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. हे प्रकरण राज्यातच नाही तर संसदेत सुध्दा गाजले होते. पालकमंत्री मकरंद पाटील यांनी भेट देऊन शासन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते. परंतु पुर्तता न झाल्यामुळे कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी २१ जुलै पासून अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे. दरम्यान शिवणी अरमाळ येथे माध्यमाशी बोलतांना स्वाती नागरे यांनी सांगितले की, प्रशासनाला दिलेल्या निवेदनद्वारे १२ दिवसात मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली मुख्यमंत्र्यांनी माझ्या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्याचे पुढे काय झाले अद्याप काहीच माहिती मिळाली नाही.

         या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि मला व माझ्या मुलांना न्याय मिळेल याकरिता वेळ मागण्यात आली. मात्र वेळ मिळाली नाही. माझे पतीचे बलिदान प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाले, प्रशासनाने त्यांच्या निवेदनाची व आंदोलनाची दखल जर घेतली असती तर ही वेळ मुलांवर आली नसती. आज न्याय मागण्यासाठी मला 
सुद्धा अन्नत्याग आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. युवा शेतकरी पुरस्कार कैलास नागरे यांच्या पत्नी म्हणून मी तेही सुद्धा आंदोलन करायला तयार आहे. मात्र राज्य सरकारला पुन्हा एकदा बलिदान घ्यायचे का? असा सवाल त्यांनी केला. राहत्या घरी शिवणी आरमाळ येथे पतीच्या प्रतिमे जवळ अन्नत्याग आमरण उपोषण सुरु केले आहे.