बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
केंद्र राज्यसरकारने मुलींच्या शिक्षणाच्या तसेच बचत ठेवीच्या योजना राबवून नोकरी व खेळामध्ये मुलींना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. बुद्धिबळासारख्या खेळामध्ये दिव्या देशमुख हिने आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्रॅण्ड मास्टर किताब मिळविला अशा अनेक क्षेत्रांमध्ये मुलींनी चमकदार कामगिरी करून भारताचे नाव लौकिक केले आहे. तरीसुद्धा देशातील काही राज्यात व जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी होत असून समाजात जनजागृती करण्यासोबत गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन करणार्या कोणत्याही राजकीय व संघटनेशी संबधित व्यक्तीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे आवाहन बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी केले.
गर्दे वाचनालयात वाचन कक्षात ३० जुलै रोजी सायंकाळी बेटी बचाओ बेटी पढाओ याविषयी जनजागृती चर्चासत्र पार पडले. यावेळी जेष्ठ विधीज्ञ व्हि.डी.पाटील, माजी नगराध्यक्ष गोकूळ शर्मा, नाना कुळकर्णी, नानासाहेब केसाळे, उदय देशपांडे, बाबा वरणगावकर उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले ज्या राज्यात मुलींचा जन्मदर घटला आहे, अशा राज्यात विविध सामाजिक संघटना शाळा, महाविद्यालाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासोबतच केंद्र व राज्य सरकार कठोर पाऊले उचलून मुलींचा जन्म होण्यापूर्वी गर्भपात करणार्यांवर कठोर कारवाई करीत आहे. काही राज्यात मुलगी जन्माला येताच कचराकुंडीत फेकून देण्याच्या निंदणीय घटना सुद्धा घडल्या आहेत. त्यावर समाजातील सुज्ञ नागरिक यांच्या पुढाकाराने अशा घटना घडू, नये यासाठी प्रयत्न करीत आहेत.
या चर्चासत्रात सहभागी झालेले लेक माझी अभियानाचे संयोजक पत्रकार राजेंद्र काळे, अरूण जैन, नितीन शिरसाट, पक्षी किटकमित्र अलोक शेवडे, जेष्ठ नागरिक संघाचे प्रकाश पिंपरकर यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाजातील असमतोल याशिवाय गर्भलिंग निदान करणार्यांना राजकीय आश्रय जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले. त्यावर डॉ. राजेंद्र फडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन संजय कुळकर्णी यांनी केले.