अवयवदानाच्या संकल्पाने जयश्रीताई शेळके यांचा साजरा झाला वाढदिवस

अवयवदानाच्या संकल्पाने जयश्रीताई शेळके यांचा साजरा झाला वाढदिवस
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा करण्याची परंपरा कायम ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्रीताई शेळके यांनी यावर्षी अवयवदानाचा संकल्प करून वाढदिवस साजरा केला. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने नेत्र शल्य चिकित्सक डॉ.तोडकर व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सहाय्यक सौरभ हिवाळे यांनी अवयवदानाचा अर्ज स्वीकारला.

        जयश्रीताई शेळके यांनी आजवर अनेक विधायक उपक्रमांतून आपला वाढदिवस साजरा केला आहे. गरजू मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेणे, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भांडवल उपलब्ध करुन देणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे यांसारख्या उपक्रमांमुळे त्यांची सामाजिक संवेदनशीलता अधोरेखित होते. यावर्षी त्यांनी अवयवदानाचा संकल्प करत समाजासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवला आहे.

        भारतात दरवर्षी लाखो रुग्ण किडनी, लिव्हर, हृदय व डोळ्यांसारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करत असतात. मात्र, उपलब्धतेअभावी अनेकांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात आणि काही वेळा प्राणही गमवावे लागतात.

      दरवर्षी सुमारे ५ लाख रुग्णांना अवयवांची गरज असते, पण केवळ १०,००० अवयवच उपलब्ध होतात. त्यामुळे दर तासाला एका रुग्णाचा मृत्यू फक्त अवयव न मिळाल्यामुळे होतो. भारतामध्ये १० लाख लोकांमागे फक्त ०.५२ लोक अवयवदान करतात. दरवर्षी किडनीसाठी २ लाख लोकांना गरज असते, पण ८,००० प्रत्यारोपणच शक्य होतात. यकृतासाठी ५०,००० रुग्णांपैकी फक्त १,५०० जणांनाच ते मिळते. १५,००० लोकांना हृदयाची गरज असते, परंतु केवळ २५० प्रत्यारोपण होतात. डोळ्यांसाठी १० लाख रुग्णांमध्ये फक्त ५,००० जणांनाच डोळे मिळतात. या पार्श्वभूमीवर ॲड. जयश्रीताई शेळके यांचा निर्णय समाजप्रबोधन आणि प्रेरणादायी कृतीचा उत्तम आदर्श ठरतो आहे.

        कार्यक्रमावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेद्रभाऊ खेडेकर, जिल्हाध्यक्ष जालिंदरभाऊ बुधवत, राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष  नरेशभाऊ शेळके, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनिलभाऊ सपकाळ, सतिषभाऊ मेहेंद्रे,  आशिषबाबा खरात, बुलढाणा तालुकाप्रमुख लखनभाऊ गाडेकर, चिखली तालुकाप्रमुख किसन धोंडगे, उपतालुका प्रमुख विजय इतवारे, किसनसेना उपजिल्हाप्रमुख अशोकराव गव्हाणे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहम्मद सोफियान, गजानन उबरहंडे, एकनाथ कोरडे, अनिकेत गवळी, संजय शिंदे इ. मान्यवर उपस्थित होते.


* देशभक्तीचा अनोखा संदेश :
     पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि देशातील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता, ॲड. जयश्रीताई शेळके यांनी आपल्या मित्रपरिवारास व सहकाऱ्यांना कोणताही जल्लोष न करण्याचे, हार-पुष्पगुच्छ वा भेटवस्तू न आणता त्याऐवजी वाढदिवसाचा खर्च ‘सैनिक कल्याण निधी’स देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेकांनी सैनिक कल्याण निधीमध्ये आपली मदत दिली आहे. तसेच पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यु पावलेल्या पर्यटकांना कार्यक्रमावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली.