लोणार पर्यटन हब व्हावे- संदीप शेळके
* वन बुलढाणा मिशन : अंजनी खुर्द येथील संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणार : (एशिया मंच वृत्त)
लोणारला जागतिक वारसा लाभला आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर पाहण्यासाठी जगातील पर्यटक लोणारला येतात. पर्यटन हब म्हणून लोणारचा विकास झाला पाहिजे. याठिकाणी ग्लोबल बायो डायव्हरर्सिटी पार्क उभारण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करु, अशी ग्वाही संदीपदादा शेळके यांनी दिली.
तालुक्यातील अंजनी खुर्द येथे ७ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिक, माता- भगिनी, युवक, बालगोपाल यांची सभेला गर्दी झाली होती. सुरुवातीला गावातून रॅली काढण्यात आली. यादरम्यान जागोजागी संदीपदादा शेळके यांचे स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण केले.
पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाचे ध्येय घेऊन वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ कार्यरत आहे. सिंचन, रोजगार, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शोषित, वंचित घटकांचा विकास अशा सर्वच आघाड्यांवर आपल्याला काम करायचे आहे. जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा आणि व्हीजन आपल्याकडे आहे. केवळ आपली साथ हवीय, असे आवाहन संदीप शेळके यांनी केले.
* हक्क अन अधिकारांबाबत जागृत राहा :
पश्चिम महाराष्ट्र विकासात आघाडीवर आहे कारण तिथल्या नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती प्रबळ आहे. नेत्यांवर जनतेचा अंकुश आहे. तेथील जनता त्यांना जाब विचारते. आपल्याकडे याउलट परिस्थिती आहे. नेत्यांचा जनतेवर अंकुश दिसून येतो. आपल्या भागातील जनतेने सुद्धा हक्क आणि अधिकार याबाबत जागृत असले पाहिजे, असे आवाहन संदीप शेळके यांनी केले.
