* कपिल पाटील यांचे आवाहन
* यवतमाळच्या शिक्षक भारती अधिवेशनात शिक्षकांचा निर्धार
यवतमाळ : (एशिया मंच न्यूज )
राज्याच्या विधानपरिषदेत शिक्षक मतदारसंघातून निवडून गेलेले सात आमदार आहेत. मात्र ते बोलत नाहीत, बोलले तर कोणाच्या बाजूने उभे राहायचे हे त्यांना कळत नाही. दोन-अडीच वर्षांपासून आपल्या शिक्षक आमदाराचा आवाज वरच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये का उठत नाही? ही खंत आम्हाला अस्वस्थ करून जाते. आता वेळ आली आहे, ती सुरेश देवकर सरांच्या पाठीशी उभे राहण्याची. शिक्षकांचा आवाज सभागृहात बुलंद ठेवण्यासाठी देवकर सरांना पहिल्या फेरीतच विजयी करूया, असा निर्धार शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कपिल पाटील यांच्यासह हजारो शिक्षकांनी केला.
यवतमाळ येथील एम.डब्ल्यू पॅलेसमध्ये रविवारी ६ सप्टेंबर रोजी शिक्षक भारतीचे जिल्हास्तरीय अधिवेशन उत्साहात पार पडले. यावेळी कपिल पाटील बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षकांना सन्मानपूर्वक वेतन मिळाले पाहिजे आणि आपण आता टप्पा अनुदान मागतो. बघा काय स्थिती आली? महात्मा फुलेंनी फुलपगार मागितला, आपण टप्पा मागितला. पण टप्पा मागितल्यामुळे टप्पा मिळणार नाही. मुंबईत मी हाजारो विनाअनुदानित शिक्षकांना थेट पूर्ण वेतनावर आणले. नो टप्पा आणि नो कप्पा! देवकर सर आमदार झाल्यावर तुमच्या विदर्भाचे सगळे टप्पा-कप्पा काढून टाकूया. नो कप्पा आणि नो टप्पा! तसेच शिक्षकांसाठी जुनी पेन्शन लावायची आहे. जी समान पेन्शन, समान वेतन, समान सन्मान देणार असल्याचेही कपिल पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक भारती यवतमाळ जिल्हाध्यक्ष रवी चांदणे यांनी केले. यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष मनोज देशमुख, बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोक खोरखडे, साहेबराव पवार, गजानन पवार, शिक्षक भारती उर्दु संघटनेचे पाचही जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती.
* शिक्षक असल्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची मला पूर्ण जाण : सुरेश देवकर
यवतमाळ जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या कार्याशी अतिशय परिचित आहे. कारण वस्तीशाळांचा जो प्रश्न या जिल्ह्यामध्ये कपिल पाटलांच्या नेतृत्वाखाली कायमचा सुटला, जे शिक्षक तुटपुंजा पगारावर सुरू झाले होते, ते आज लाख भर पगारापर्यंत पोहोचले, ते काम शिक्षक भारती संघटनेने करून दाखवले असल्याचे, शिक्षक भारतीचे अमरावती शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुरेश देवकर यांनी सांगितले. शिक्षकांच्या खूप संघटना माहिती आहेत, परंतु त्या संघटना एका विशिष्ट शैक्षणिक घटकावर काम करतात. सीनियर कॉलेजेसची जी संघटना असेल, ती सीनियर कॉलेजेसचा प्रश्न हाताळते. ज्युनिअरची संघटना ज्युनिअरचा विषय पाहते. माध्यमिकमध्ये विमाशी सारख्या संघटना काम करतात. अजूनही इतर संघटना आहेत, त्या त्यांच्या-त्यांच्या घटकाशी निगडित असलेले प्रश्न सोडवतात. परंतु समग्रपणे संपूर्ण शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणारे प्रश्न सोडवण्याचे काम शिक्षक भारती ही एकमेव संघटना करते. आजरोजी असंख्य ॲप्सद्वारे विविध सर्वेक्षणे शिक्षकांना करावी लागत आहे. अनेक अशैक्षणिक कामे त्यांच्यावर लादली जात आहे. २० वर्ष शिक्षक म्हणून काम केल्याने शिक्षकांचे प्रश्न आणि समस्या मला ज्ञात आहेत. आगामी काळात शिक्षकांचा आवाज सभागृहात बुलंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सुरेश देवकर म्हणाले.
* शिक्षकांसाठी मुंबईत होस्टेल तर प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक सेवा केंद्र
अमरावती शिक्षक मतदारसंघातून मुंबईला कामानिमित्त येणाऱ्या शिक्षकांची राहण्याची गैरसोय होते. शिक्षक मंत्रालयात किंवा इतर कामानिमित्त मुंबईत आले असता त्यांना निवासासाठी होस्टेल उभारणार असल्याची घोषणा शिक्षक भारतीचे अमरावती विभागीय अध्यक्ष सुरेश देवकर यांनी केली. विभागातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांसाठी शिक्षक सेवा केंद्र, बुलढाण्यात ताराबाई शिंदे यांचे स्मारक निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले
