* आमदार श्वेताताई महाले यांचा आरोप !
* युवक काँग्रेसचे पदाधिकारी सह 240 युवकांनी केला भाजपात प्रवेश
चिखली : (एशिया मंच वृत्त)
मतदार राजांनी मला चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून दिले, त्यांच्या मतदान रूपी आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोहोचले. त्यामुळे या परिसराच्या विकासाची व लोकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि जनसेवेच्या या कामामध्ये जर मला माझे पती व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले, भाऊ शिवराज पाटील, वृषभ पाटील, वडील अंकुशराव पाटील आदी कुटुंबीय निरपेक्ष भावनेने मदत करत असतील तर त्यामध्ये विरोधकांचे विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांचे पोट दुखण्याचे काय कारण ? असा परखड प्रश्न आ. श्वेताताई महाले यांनी उपस्थित केला. त्या २७ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय जनता पक्षामध्ये युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आयोजित कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी संतोषबापू देशमुख, माजी आमदार विजयराज शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, डॉ. प्रतापसिंह राजपूत, विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख सुनील वायाळ, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, आनंदराव हिवाळे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, शिवराज पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर पुरोहित, शैलेश बाहेती, गोविंद देव्हडे, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष शेख अनीस, सुभाषअप्पा झगडे, दत्ता सुसर, नामू गुरुदासानी, विक्की हरपाळे, आदी पदाधिकारी या प्रसंगी मंचावर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, माजी आमदार विजयराज शिंदे आणि शेख अनीस यांचीही याप्रसंगी भाषणे झाली.
* माजी आमदारांच्या गल्लीतील शेकडो युवक भाजपात :
चिखली शहरात काँग्रेस मधून भाजपात मोठ्या प्रमाणावर युवकांचे इनकमिंग सुरूच आहे. आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत युवक काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. एकाच महिन्यात होणारा पक्षप्रवेशाचा हा तिसरा कार्यक्रम होता. अनिल इंगळे, ऋषिकेश ढवळे, सागर जाधव, सुरज कदम, दीपक सुरडकर, उमेश खरे, दादाराव असरमोल, प्रतीक गवई, भारत कासारे, बिपीन इंगळे, सागर जाधव, अनिल भंडारे, समीर शेख, अकीब पठाण, सागर सवडतकर, विशाल पवार, योगेश कापसे, संजय पाखरे, संदीप सूर्यवंशी, निलेश सूर्यवंशी, देवा भाटी, अनुराग गायकवाड, उमेश खरे, राजू खरे, मनोज शिंगणे, दिलीप लोखंडे, किरण पवार, सचिन शर्मा, अर्जुन बोंद्रे यांच्यासह माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे निवासस्थान असलेल्या राजा टाँवर परिसरातील जय गणेश गृपचे सदस्य याशिवाय रोहिदास नगर, गजानन नगर, चव्हाणवाडी, खडकपुरा, राऊतवाडी परिसरातील २४० युवक भाजपामध्ये सहभागी झाले. आ. श्वेताताई महाले, जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे आदी मान्यवरांनी या कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे श्रीराम नागरी पतसंस्थेचे सभागृह दणाणून गेले होते. यापूर्वी ६०० युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून आज त्यामध्ये २४० युवा कार्यकर्त्यांची भर पडली आहे. प्रवेश करणाऱ्या सर्व युवा -युवकांची यादी वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये ते छापणे शक्य नसून त्यांची नावे इतर माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतील असा खुलासा आ. श्वेताताई महाले यांनी केला.
....तेव्हा माजी आमदार सक्षम नव्हते काय ?
आपली हिंदू संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये पती-पत्नी हे परस्परांच्या कामांमध्ये सहकार्य करतात ही आपली परंपरा आहे. याच संस्कृती आणि परंपरेला अनुसरून माझे पती विद्याधर महाले हे माझ्या कामांमध्ये मला मदत करतात असे स्पष्टीकरण आ. श्वेताताई महाले यांनी केले. आमदार म्हणून मतदारसंघातील प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहणे शक्य नसते याची जाणीव मला आहे; माजी आमदार राहुल बोंद्रे हे देखील स्वतः जातीने प्रत्येक ठिकाणी हजर राहू शकत नव्हते अशा प्रसंगी त्यांच्या पत्नी वृषालीताई बोंद्रे यांनी अनेक ठिकाणी राहुल बोंद्रे यांचे प्रतिनिधित्व केल्याचे मी पाहिले आहे, असे देखील आ. महाले म्हणाल्या. मग याचा अर्थ राहुल बोंद्रे हे त्यांची जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नव्हते असा घ्यावा काय ? असा प्रतिसवाल देखील श्वेताताई महाले यांनी यावेळी केला. खरे तर माझा परिवार या व्याख्येत केवळ माझा कुटुंबातील सदस्य नसून भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता व आज भाजपात सहभागी झालेले युवक हे सुध्दा समाविष्ट आहेत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. त्यामुळे माझ्या पतींच्या आडून माझ्यावर टीका करणाऱ्या काँग्रेस पक्षातील नेत्यांनी या गोष्टीचे भान राखावे आणि जनतेचा बुद्धिभेद करू नये असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी केले.
