ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या हस्ते यशस्वी तरुणांचा सत्कार* नांद्रकोळी गावाचा अभिमान : एकाच वेळी पाच तरुणांची भारतीय सुरक्षा दलात निवड

ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या हस्ते यशस्वी तरुणांचा सत्कार
* नांद्रकोळी गावाचा अभिमान : एकाच वेळी पाच तरुणांची भारतीय सुरक्षा दलात निवड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        येथून जवळच असलेल्या नांद्रकोळी  येथील एकाच गावातून तब्बल पाच तरुणांची भारतीय सुरक्षा दलांमध्ये निवड होणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. प्रविण संजय चौधरी (CISF), गणेश राजू शिंदे (CISF), आकाश प्रकाश राऊत (BSF), सचिन गणेशराव राऊत (CISF) आणि दिलीप अर्जुन उबाळे (CISF) या पाचही तरुणांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर देशसेवेचा मान मिळवला आहे.

        विशेष म्हणजे हे सर्व तरुण शेतकरी कुटुंबातून आलेले असून, आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या बळावर हे यश संपादन केले आहे. आजचा तरुण बेरोजगारी, स्पर्धा आणि सामाजिक तणावामुळे निराशेकडे झुकत असताना, नांद्रकोळीच्या या पाच तरुणांनी कठोर परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर यश संपादन करून आशेचा नवा किरण निर्माण केला आहे. त्यांच्या यशामुळे तरुणांनी निराशेला दूर सारून ध्येयवादी व देशसेवेची वाट निवडावी, असा प्रेरणादायी संदेश समाजाला मिळाला आहे. या सर्वांबरोबरच नांद्रकोळी गावचेच विष्णू पुंडलिक उबाळे हे मागील दोन वर्षांपासून मिझोराम येथे CRPF मध्ये कार्यरत असून, ते देखील गावासाठी अभिमानाचे प्रतीक ठरत आहेत. 

       या यशस्वी तरुणांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जयश्रीताई शेळके म्हणाल्या की, ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील तरुणांनी देशसेवेच्या माध्यमातून मिळवलेले हे यश संपूर्ण समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अशा तरुणांच्या पाठीशी समाज आणि शासनाने भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.

      यावेळी नांद्रकोळी गावचे उपसरपंच मनोज जाधव, भानुदास हुडेकर, अशोक हूडेकर, नाना राऊत, राहुल चौधरी, परमेश्वर वानखेडे उपस्थित होते.